नव्या कथा, नव्या जाणिवा, नवे विषय आणि नव्या स्वरूपाची मांडणी यामुळे मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध झाली असल्याची प्रचिती ‘पिफ’मध्ये चित्रपट रसिकांना येत आहे. गौरी गाडगीळ या विशेष मुलीची कथा सांगणारा ‘यलो’, व्यक्तिगत जीवनानुभव कथन करणारा ‘किल्ला’ आणि मध्यमवर्गीयाची उलघाल सांगणारा ‘डोंबिवली रिटर्न्‍स’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि कलाकारांशी झालेल्या संवादातून ही बाब अधोरेखित झाली.

‘डोंबिवली रिटर्न्‍स’ चित्रपट हा
‘डोंबिवली फास्ट’चा सिक्वल नाही!

‘डोंबिवली रिटर्न्‍स’ ही मध्यमवर्गीय नायकाच्या अंतरंगाममध्ये सुरू असलेल्या उलघालीची कहाणी आहे. मात्र, हा चित्रपट म्हणजे ‘डोंबिवली फास्ट’चा सिक्वल नाही, असे ‘डोंबिवली रिटर्न्‍स’ या हिंदूी चित्रपटाचे दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई आणि अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
संदीप कुलकर्णी म्हणाले, ‘डोंबिवली फास्ट’च्या नायकाचा प्रवास हा प्रतिक्रियावादी असा आहे. ‘डोंबिवली रिटर्न्‍स’मध्ये नायकाच्या अंतरंगामध्ये सुरू असलेली उलघाल सांगते. हा प्रवास माझ्यातील अभिनेत्याला भावला. हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातून हा चित्रपट हिंदूीमध्ये केला आहे. या विषयाचे महत्त्व जाणवल्याने आणि चित्रपटाचे बजेट वाढत असल्यामुळे मी निर्माता होण्याचे ठरविले. सध्या तरी हा चित्रपट डब करून अन्य प्रादेशिक भाषांमध्ये नेण्याचा विचार नाही. मात्र, ‘डोंबिवली फास्ट’च्या डबिंगचे हक्क दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी दुसऱ्याच आठवडय़ात घेतले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी तमिळमध्ये हा चित्रपट केलाही होता.
डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणारे महेंद्र तेरेदेसाई यांचे ‘डोंबिवली रिटर्न्‍स’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनातील पदार्पण झाले आहे. ‘अर्धसत्य’ चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातील नायकाचे अनंत वेलणकर हेच नाव जाणीवपूर्वक ठेवले आहे का, असे विचारले असता महेंद्र तेरेदेसाई म्हणाले, एक तर नायकाचे हेच नाव देण्यामागे विजय तेंडुलकर यांना अभिवादन करण्याची भावना होती. ‘अर्धसत्य’ चित्रपटातील अनंत वेलणकर हा पोलीस अधिकारी असला तरी तो सामान्य मराठी माणसांचा प्रतिनिधी आहे. ‘डोंबिवली रिटर्न्‍स’ ही मध्यमवर्गीय आणि मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या माणसाची कथा आहे.

सेटबॉय ते दिग्दर्शक हा प्रवास उलगडणारा ‘किल्ला’

पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) मध्ये केलेला व्हिडिओग्राफीचा अभ्यासक्रम.. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्यासमवेत सेटबॉय म्हणून केलेले काम.. जाहिरातीसाठी सहायक म्हणून काम केल्यानंतर अनिल मेहता यांचा सहायक म्हणून काम करण्याची संधी.. जीवनाच्या प्रवासातील हे अनुभवाचे गाठोडे उलगडण्यासाठी लढविलेला ‘किल्ला’.. हा प्रवास सांगितला ‘किल्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी.  
वडिलांची बदली झाल्यामुळे सोलापूर या गिरणगावातून बालपणीच झालेले निसर्गरम्य कोकणामध्ये स्थलांतर, सततच्या बदल्यांमुळे कुटुंबाला होणारा त्रास आणि मनस्ताप, याही प्रतिकूलतेवर मात करीत लढविलेला किल्ला हे व्यक्तिगत जीवन चित्रपटातून मांडले असल्याचे अविनाश अरुण यांनी सांगितले. मी मूळचा सोलापूरचा. वडिलांची बदली झाल्यामुळे वय वर्षे तीन ते सहा कोकणामध्ये गेले. नोकरीमध्ये वडिलांची सतत बदली होत गेल्यामुळे माझ्या शिक्षणाची परवड होऊ लागली. मलाही सतत शाळा बदलाव्या लागल्या. एके दिवशी खूप त्रास झाल्यामुळे घरी आल्यानंतर मला शाळाच शिकायची नाही, असे मी सांगितले. मग पूर्वीच्याच शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केले. हा माझ्या जगण्याचा अनुभव ‘किल्ला’ चित्रपटातून उलगडला आहे. हे अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावेत या उद्देशाने चित्रपट करण्याचे मनामध्ये होते, पण हे स्वप्न एवढय़ा लवकर पूर्ण होईल असे वाटले नव्हते, असे अविनाश अरुण यांनी सांगितले.
चित्रपटाची आवड असल्याने वडिलांबरोबर आठवडय़ातून दोन चित्रपट पाहणे होत असे. दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केला, पण पदवी नसल्याने ते शक्य झाले नसले तरी बारावीला असताना व्हिडिओग्राफीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र, दिग्दर्शक होईन असे त्या वेळी ठरविले नव्हते, असेही अविनाश अरुण यांनी सांगितले.

कॅमेरामन ते दिग्दर्शक प्रवास आनंददायी

गेली दहा वर्षे कॅमेरामन म्हणून काम करीत आहे, पण ‘यलो’ हा सशक्त विषय सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातून कॅमेरामन ही भूमिका बदलून दिग्दर्शक झालो. हा प्रवास आनंददायी असल्याची भावना ‘यलो’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांनी सांगितले.
विशेष मुलांकडे सहानुभूती म्हणून पाहू नये, तर या मुलांकडून आपल्याला काही गोष्टी शिकता येतात हे मला गौरी गाडगीळ या मुलीच्या कथेतून दाखवायचे होते. हा विषय हाती आला आणि दिग्दर्शक म्हणून पेलताना मला आनंद झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा १५ महिन्यांचा काळ हा माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. ‘यलो’ हे स्वप्न साकार झाले याचा आनंद तर होताच, पण रीतेश देशमुख याच्या सहकार्यामुळे मी हा चित्रपट वितरित करून लोकांपर्यंत नेऊ शकलो याचे समाधान अधिक आहे, असेही महेश लिमये यांनी सांगितले.