पुणे : करोना संसर्ग संपेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी वावरताना राज्यातील नागरिकांना मुखपट्टी परिधान करणे बंधनकारक असेल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. तसेच मुखपट्टी वापराचे बंधन उठवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चाही झालेली नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णयही घेण्यात आलेला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. या संदर्भात काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातम्या धादांत खोटय़ा आहेत, असेही पवार म्हणाले काही पाश्चात्त्य देशांनी मुखपट्टीची सक्ती काढून टाकल्याची माहिती गुरुवारी (२७ जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील करोना सद्य:स्थिती सादरीकरणात समोर आली. या निर्णयाला काही वैद्यकीय-वैज्ञानिक आधार आहे किंवा कसे, याचा अभ्यास कृती गटाने (टास्क फोर्स) करावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. याबाबत पुणे दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘मुखपट्टी वापराचे बंधन काढून टाकण्याबाबत वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिल्याचे पाहण्यात आले. तसेच याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची बातमीही प्रसृत करण्यात आली आहे. मात्र, हे धादांत खोटे असून अशा प्रकारची कोणतीही चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झालेली नाही. करोना संपेपर्यंत महाराष्ट्रातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टी परिधान करणे बंधनकारकच असेल.’ काही पाश्चात्त्य देशांनी मुखपट्टी वापराचे बंधन काढून टाकण्याचा निर्णय घेतला असेल. मात्र, महाराष्ट्रात सद्य:परिस्थिती पाहता घराबाहेर मुखपट्टी परिधान करणे आवश्यक आहे. मुखपट्टीचे बंधन काढून टाकण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चाच झालेली नसल्याने याबाबतचा निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे याबाबतच्या आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.