पुणे : अजित पवार यांच्या महायुतीमधील समावेशामुळे आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर ‘संभ्रमा’त असलेल्या कार्यकर्त्यांना मार्ग दाखविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रविवारी केला. येथे झालेल्या अधिवेशनात शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले. ‘शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके आहेत,’ ‘पराभूत होऊनही राहुल गांधी अहंकाराने फुगले आहेत,’ ‘उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी असून औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत,’ अशा कडवट शब्दांत विरोधकांवर टीका करून भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदेश भाजपचे अधिवेशन रविवारी पुण्यात पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे राज्यातील मंत्री, नेते उपस्थित होते. शहा, फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांवर कडाडून टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकातील लेखात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील युतीमुळे भाजप कार्यकर्ता ‘संभ्रमा’त असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्यावर टीका करतानाच हिंदुत्वाचा मुद्दाही जोरकसपणे मांडून कार्यकर्त्यांना एक प्रकारे या मुद्द्यांवर निवडणुका लढण्याचा संदेश दिला गेला. ‘हिंदुत्वाचा मुद्दा आणि विचारधारा भाजपने कधीही सोडलेली नाही. ध्येय साध्य करण्यासाठी तह किंवा सलगी करावी लागते,’ अशा शब्दांत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न झाला. ‘महाविकास आघाडी म्हणजे हवा भरलेला फुगा असून, विधान परिषदेच्या निवडणुकीत फुग्याला टाचणी लागली आहे. विधानसभा निवडणुकीत हा फुगा फुटेल,’ अशा शब्दांत भाजप नेत्यांनी विरोधकांना धारेवर धरले.

हेही वाचा >>>मुंबईसह विदर्भाला पावसाचा दिलासा, पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज

विजयी होऊनही कार्यकर्ते निराश आहेत. त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, याची कबुली देतानाच, आगामी विधानसभा निवडणुकीतील विरोधकांच्या खोट्या राजकीय कथानकाला त्याच भाषेत उत्तर द्या, आदेशाची वाट पाहू नका, असा कानमंत्र फडणवीस आणि शहा यांनी दिला. ‘लोकसभा निवडणुकीतील खोट्या राजकीय कथानकातून शिकलो आहे, विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होणार नाही,’ असा विश्वास व्यक्त करून विधानसभा निवडणुकीची रणनीतीही स्पष्ट करण्यात आली. ‘आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला. तर, ‘उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आणि खुनी आहेत,’ असा हल्लाबोल बावनकुळे आणि मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आशीष शेलार यांनी केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीची चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, ते अनुपस्थित राहिल्याने त्याची चर्चा रंगली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब’ असून, त्याचे अध्यक्ष श्रीमान उद्धव ठाकरे आहेत.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

समाजात दुफळी वाढविण्याचे काम काही नेते करत आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही, असे कोणी म्हटले होते? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mav leaders bjp campaigning convention ajit pawar mahayuti amy