पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून, आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. एमपीएससीमार्फत विविध शासकीय पदांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते. एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती. मात्र निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर खुल्या गटातील (अराखीव) उमेदवारांना कमाल सहा संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी २०२० मध्ये निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते. या निर्णयाच्या अनुषंगाने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. मात्र आता एमपीएससीकडून या निर्णयात फेरबदल करण्यात आला आहे. उमेदवारांकडून प्राप्त झालेली निवेदने, पदभरतीवरील निर्बंधांमुळे उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या कमी संधी आणि उमेदवारांचे नुकसान होऊ नये या सर्व बाबींचा एमपीएसीने सर्वागीण विचार केला. त्या अनुषंगाने उमेदवारांना त्यांच्या वयोमर्यादेनुसार संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. - सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी