पुणे : ‘राजकारण गुंतागुंतीचे नसून वैचारिक पद्धतीने समजून घेतल्यास ते सहज उमजते. राजकारणात दिसणे आणि बघणे यामध्ये मोठा फरक असून मतदार प्रगल्भ होणे आवश्यक आहे, तरच लोकशाही सशक्त आणि बळकट होईल,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी रविवारी व्यक्त केले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल ही आवई हेतुपूरस्सर पसरवली जात आहे,’ असेही त्यानी नमूद केले.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या पुणे विभागाच्या वर्धापनदिनानिमित्त खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते भाऊ तोरसेकर यांना ऋग्वेद भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी सुशील कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये तोरसेकर बोलत होते. याच कार्यक्रमात गायिका रागेश्री वैरागक-कुलकर्णी यांना संगीत पुरस्कार आणि अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, मुंबई या संस्थेला समाजभूषण पुरस्कार आणि वेदमूर्ती मंदार क्षीरसागर यांना ऋग्वेद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, विश्वस्त प्रशांत वैद्य, सुनीता तावरे, सुधाकर कुलकर्णी, सुलभा शिरगावकर, कार्याध्यक्ष जयंत देशपांडे, चिटणीस सुनील पारखी, समिती प्रमुख अनिल पानसे यावेळी उपस्थित होते.

तोरसेकर म्हणाले, ‘सध्याच्या राजकारणात उथळ दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्यातून अनेकांना मी मांडलेले मत पटतही नसेल. मात्र, कोणत्याही गोष्टीवर बोलताना किंवा टीका करताना त्या गोष्टीचा अभ्यास करणे ती व्यक्ती किंवा त्याचा अभ्यास करून मत प्रकट करणे महत्वाचे आहे. सध्याचे राजकारणही वैचारिकदृष्ट्या समजून घेणे महत्त्वाचे आहेे. अनेकांना राजकारणातील गोष्टी कळत नसताना आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून पोपटासारखे बोलत आहेत.’

कुलकर्णी म्हणाल्या, ‘सध्या ब्राह्मण समाजात केवळ सुशिक्षित सुसंस्कृत, संस्कारी असे म्हणवून घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गुढीपाडवा आणि इतर सणांना पुरणपोळी करून, सजून धजून, धार्मिक ठिकाणी जाऊन सन साजरे केले म्हणजे हिंदू संस्कृती टिकवली, मुलांच्या मुंजी करून त्यांच्यावर चांगले संस्कार केले, असे होत नाही. ज्यांच्या मुलांना प्रत्यक्षात गणपतीची आरतीही येत नाही त्यांनी स्वतःला ब्राह्मण म्हणवून मिरवण्याची गरज नाही. जाती-पातींऐवजी सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.’

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटात डोक्यावर शेंडी, हातात तलवार घेवून नाचतानाचे क्षण दाखविण्यात आले. हे आमचे दैवत आहे. यावेळी उपस्थित केलेला वैचारिक बुद्धीभ्रम मोडून काढता आला पाहिजे होता. आणखी किती दिवस असे कार्यक्रम घेऊन, उपस्थिती लावून, गंभीरतेने श्रवणभक्ती करून आणि घरात वरण भात खाऊन बसणार आहोत. त्यापेक्षा कृती करण्यासाठी एकत्र आले पाहिजे.

वंदे मातरम् म्हणत नाही, अशा वृत्तींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. १५० वर्ष नाही पुढचे ३००-५०० वर्षापर्यंत वंदेमातरम मारले जाईल यासाठी एकत्र आले पाहिजे. महापुरुषांच्या, दैवतांचा अपमान करणाऱ्यांविरोधात ब्राह्मण किंवा जात-पात सोडून हिंदू म्हणून एकत्र यावे, असे आवाहन डाॅ. कुलकर्णी यांनी केले.