राज ठाकरे यांची विचारणा पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत निघालेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचे के ंद्र आणि राज्य शासनाला मान्य आहे. मग अडलंय कु ठे? न्यायालयात नीट बाजू का मांडली जात नाही. फक्त माथी भडकाविण्याची कामे करायची आहेत का, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी के ली. कोण कोणाचा शत्रू आहे तेच कळत नाही. या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर बसवा आणि विचारा, अशी मागणीही त्यांनी के ली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी पेठेतील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबू वागसकर, अनिल शिदोरे या वेळी उपस्थित होते. नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण, के ंद्रीय सहकार मंत्रालय, आगामी निवडणूक, ईडीची कारवाई याबाबत त्यांनी भूमिका मांडली. नवी मुंबईतील विमानतळाचे के वळ स्थलांतर होत आहे. त्यामुळे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मी पुण्यात स्थायिक झालो तर राज मोरे होणार नाही. राज ठाकरेच राहणार आहे. त्यामुळे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेसकडे सत्ता असताना ईडीचा गैरवापर करण्यात आला. ईडीचा बाहुली म्हणून वापर होऊ नये. ज्यांनी खरे गुन्हे के ले ते गुन्हेगार मोकाट आहेत. एकनाथ खडसे यांच्याकडून सीडीची वाट पाहत आहे. माझ्यावर ईडीची कारवाई के ली तर मी सीडी बाहेर काढेन, असे ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या सीडीची मी वाट पाहत आहे. नव्या के ंद्रीय सहकार मंत्रालयामुळे राज्याच्या सहकार क्षेत्राला काय फटका बसेल, हे शरद पवारच सांगू शकतील, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. परिस्थिती पाहून निर्णय निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या माझं इंजिन मीच चालवित आहे, असे उत्तर त्यांनी निवडणुकीत एकला चलो रे ही भूमिका असणार का, या प्रश्नावर दिले.