काँग्रेसचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून केंद्रातील मोदी सरकार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ मैं भी राहुल गांधी मोहीम हाती घेत केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राज्याचे सहकार राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, राजेश राठोड, लहू कानडे, जयंत आसगांवकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, महिला शहराध्यक्षा पूजा आनंद, माजी नगरसेवक आबा बागुल, लता राजगुरू, अविनाश बागवे, चंदू कदम, रफिक शेख उपस्थित होते.सरकारी यंत्रणांच्या गैरवापरामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरु झाली आहे. या प्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. सूडाचे राजकारण करून विरोधकांना त्रास दिला जात आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांन रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला पाहिजे, असे डाॅ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.प्रणिती शिंदे म्हणाल्या की,सार्वजनिक संस्था विकल्यानंतर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पाडल्याने त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला आहे.