बारामती, हवेलीसह सात तालुक्यांत संवेदनशील केंद्र नाही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी संवेदनशील मतदान केंद्राचा आढावा प्रशासनाने घेतला असून, जिल्ह्यात एकूण १०५ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे ५८ संवेदनशील मतदान केंद्र एकटय़ा मावळ तालुक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती, हवेलीसह सात तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत एकही संवेदनशील केंद्र नाही. संवेदनशील सर्वच केंद्रावर मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणांसोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत संवेदनशील मतदान केंद्रांबाबत चर्चा करण्यात आली. पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रापासून शंभर किंवा दोनशे मीटरच्या परिसरात मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न, गोंधळ, अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असल्यास त्याचप्रमाणे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराची पाश्र्वभूमी पाहता संबंधित मतदान केंद्र संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील ठरविले जाते. या निकषानुसार जिल्ह्यातील ३ हजार ३६९ मतदान केंद्रांपैकी १०५ केंद्र संवेदनशील असल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. निवडणुकीच्या कालावधीत एखाद्या ठिकाणी काही गोंधळ झाल्यास तेथील मतदान केंद्रही संवेदनशील केंद्रांच्या यादीत टाकण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.