बालगंधर्व रंगमंदिरातील असुविधांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल अलीकडेच बालगंधर्व रंगमंदिरात एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी याच रंगमंदिराची अगदी लख्ख साफसफाई करण्यात आली होती. हीच तत्परता नाट्यरसिकांसाठी का दाखविता येत नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिका आयुक्तांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि आवश्यक डागडुजीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. कलाकार आणि रसिकांच्या निखळ आनंदात डास आणि दुर्गंधीचा अडसर असू नये याची दक्षता घ्यावी. तसेच शहरातील अन्य रंगमंदिरांच्या साफसफाई आणि इतर आवश्यक गोष्टींचा दैनंदिन आढावा घेण्याची यंत्रणा सक्रिय करण्याची मागणीही त्यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वातानुकुलन यंत्रणा नादुरुस्त असणे, डास आणि दुर्गंधीबाबत कलाकारांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले यांनीही समाजमाध्यमांत या बाबत संताप व्यक्त केला होता. त्या बाबतचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमात भूमिका मांडली. हेही वाचा >>>पुणे: आरटीईअंतर्गत रिक्त जागांवर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश, राज्यभरात ३० हजार जागा रिक्त महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी आग्रहाने बालगंधर्व रंगमंदिर ही वास्तू पुण्यात उभी करवून घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांनी या वास्तुचे उद्घाटन केले. सांस्कृतिक राजधानी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पुणे शहराचे ‘बालगंधर्व रंगमंदिर’ हे सांस्कृतिक वैभव आहे. म्हणूनच या वैभवाची जपणूक करणे ही समस्त पुणेकरांच्या वतीने महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता आहे. कलाकारांच्या ग्रीन रुम्सपर्यंत याचा फटका बसलेला आहे. मुख्य सभागृहात डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे. याचा नाट्य रसिकांना प्रचंड त्रास होतो. स्वच्छतागृहाची तर अतिशय दयनीय अवस्था आहे. पुणेकरांचा हा मानबिंदू टापटीप आणि स्वच्छ रहायला हवा. कलाकार आणि रसिकांच्या निखळ आनंदात डास व दुर्गंधीचा अडसर असू नये, असे सुळे यांनी नमूद केले.