पुणे : महापालिकेने दक्षिण पुण्यातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी एक दिवस वेगवेगळ्या भागांतील पाणी आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आठवडाभर करून परिस्थितीचा फेरआढावा घ्या, त्यानुसार पाणीकपात सुरू ठेवायची, की रद्द करायची याचा निर्णय घ्या, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाला सोमवारी दिल्या.
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा भागात चक्राकार पद्धतीने आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, सहकारनगर, दत्तनगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा बुद्रुक या परिसरामध्ये हा निर्णय लागू आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाचा अभाव आणि वितरणातील त्रुटींमुळे महापालिकेने ही पाणीकपात लागू केल्याचा आरोप केला जात आहे. या भागातील नागरिकांकडूनदेखील पाणीकपातीस विरोध होत आहे. एक दिवस पाणी बंद ठेवल्यानंतर त्याचा दुष्परिणाम पुढील दोन ते तीन दिवस होतो.
‘शहरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. पाण्याची मागणी वाढली असेल अथवा पुरवठा विस्कळीत झाला असल्यास प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करावा. मात्र, कपात करणे योग्य नाही. आठवडाभर या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर याचा पुन्हा आढावा घेऊन निर्णय घ्यावा,’ अशा सूचना आयुक्त डॉ. भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाला केल्या आहेत.