नारायण राणे यांचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र खोटे बोलतात, नुसतेच थापा मारतात. भाजप गुंडांचा आणि खोटारडय़ांचा पक्ष आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्याचा बट्टय़ाबोळ केला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी रविवारी दापोडीत बोलताना केली. मुख्यमंत्री जातीयवादी असून राज्यभरात सुरू झालेले प्रतिमोर्चे हे मुख्यमंत्र्यांचे पिल्लू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दापोडीत झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, शहराध्यक्ष सचिन साठे, माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदींसह सभेसाठी तुडुंब गर्दी होती. तासाभराच्या भाषणात राणे यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढवतानाच मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. घोषणांचा सुळसुळाट आणि जाहिरातबाजीच केली. त्यांच्या कारभारामुळे समाजातील सर्व घटक बेजार आहेत. ४० ते ७० टक्क्य़ापर्यंत महागाई वाढली आहे. भाजपच्या मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव नाही. त्यांची भाषा असंसदीय आहे. मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. पालकमंत्री ‘डाळ भ्रष्टाचारमंत्री’ आहेत. पदवी घोटाळ्यातील शिक्षणमंत्री थट्टेचा विषय बनले आहेत. मुख्यमंत्री सर्वाना ‘क्लीन चीट’ देत सुटले आहेत. भ्रष्टाचार नाही, असे एकही ठिकाण नाही. भाजपचे कार्यालयही त्यातून सुटलेले नाही. सत्ता द्या, गुंडगिरी संपवू, असे मोदी म्हणायचे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनीच ‘गुंडा सेल’ सुरू केला आहे. ते दररोज गुंडाना प्रवेश देत आहेत. वाजपेयींचा भाजप राहिला नसून तो गुंडांचा पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचा असतो, भाजपचा किंवा ‘आरएसएस’चा नसतो, याचे त्यांना भान नाही. मुख्यमंत्री जातीयवादी असून त्यांनी संघाची तसेच ठराविक जातीची माणसे आणून बसवली आहेत. आठ लक्ष कोटींची गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री सांगतात. प्रत्यक्षात १० टक्क्य़ांचे प्रस्ताव आले असून एकही उद्योग सुरू झालेला नाही. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या आणि गुंडगिरी पोसणाऱ्या भाजपच्या हातात सत्ता देऊ नका, असे आवाहन राणे यांनी केले. स्वागत बाळासाहेब साळुंके यांनी केले. नरेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. सिकंदर सूर्यवंशी यांनी आभार मानले. शिवसेनेच्या मंत्र्यांना किंमत नाही सत्तेत असूनही शिवसेनेचे अस्तित्व नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांना किंमत नाही. त्यांनी मुंबईत काय दिवे लावले, तेव्हा ते गोव्यात लढायला निघाले आहेत. महाराष्ट्राची सध्या जी दुरवस्था झाली आहे, त्यास उद्धव ठाकरेही जबाबदार आहेत. - नारायण राणे.