पुणे : महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी, जाती-धर्मात निर्माण झालेले तेढ-भांडणे, मोठ्या व्यक्तींचे ‘फोन टॅपिंग’, कोयता गँग या प्रकारांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून याच्या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव कळीचे नारद आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत करत याची सत्यता जाणून घ्यायची असेल, तर फडणवीस यांची ‘नार्को टेस्ट’ करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तसेच अजित पवार यांना भ्रष्टाचारातील पैसे कमी पडले असून आता त्यांना गुंड, बलात्काऱ्यांचीही गरज पडत आहे. त्यांनी लोकशाही चिरडून टाकली आहे. भारतीय जनता पक्षावर विखारी आरोपर करूनही त्यांना सत्तेतून हाकलून दिले जात नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर केवळ एकमेकांवर आरोप करून जनतेला वेड्यात काढण्याचे प्रकार असून खरोखर हिंम्मत असेल, तर फडणवीस यांनी लाचारी न पत्करता पवार यांना सत्तेबाहेरचा रस्ता दाखवावा आणि पवार यांनी सत्तेला ढेकणासारखा चिटकून न राहता राजीनामा द्यावा. एकमेकांमध्ये नुरा कुस्ती करत जनतेला वेड्यात काढण्याचे प्रयत्न करू नये, अशी टीपण्णीही केली.

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अँड. अभय छाजेड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले, ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत बिघडली आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराची ओळख आता कोयत्या गँगसारख्या दहशतीने होत आहे. शहराशहरांमध्ये अल्पवयीन मुले गुन्हेगारीत सापडत आहे. अपघात, जाती धर्मावरून तेढ निर्माण करत दंगलीचे प्रकार, हल्ले होत आहेत. मंत्र्यांच्या फोन टॅपींग प्रकरणात ज्यां अधिकाऱ्यावर आरोप ठेवण्यात आले, त्यांनाच फडणवीस यांनी पोलीस खात्यात वरिष्ठ पद बहाल केले. कायदा सुव्यवस्था बिघडली असून याला मुख्यमंत्री आणि गृहखात्याचे मंत्री फडणवीसच जबाबदार आहे.’

तसेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या अजित पवार यांनाच सत्तेत सहभागी करून घेतले आहे. तेच अजित पवार भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा आरोपर करत असून फडणवीस लाचारासारखे शांत बसले आहेत. याचाच अर्थ एकाच भ्रष्टाचारी नाण्याच्या दोन बाजू आहोत, हे भाजप आणि राष्ट्रवादी सिद्ध करत आहे. रंग बदलणाऱ्या प्राण्याला लाजवेल असे हे सत्तेतील बहुरुपी आहेत, अशा परखड शब्दात सपकाळ यांनी समाचार घेतला.

कांँग्रेस-राष्ट्रवादी जागांमुळे विभक्त

महाविकास आघाडी एकत्र असताना काँग्रेसपक्षाच्या वाट्याला सातत्याने कमी जागा मिळत होत्या. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत जाण्यासाठी पहिल्यापासून विरोध दर्शविल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र येऊ शकले नसल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

७० हजार कोटीतून योजना…

लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रुपये, महिलांना बिनव्याजी कर्ज, दरवर्षी दोन कोटी रोजगार अशा या पोकळ घोषणा आहेत. मात्र, या योजनांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचारातील पैशातून केला जाणार आहे, असे आश्वासन दिले, तर नक्कीच या योजना मार्गी लागतील, अशी खोचक टीपण्णी करताना अजित पवार यांचा हा घोटाळा आमच्यासोबत असतानाच झाला असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

प्रमुख मुद्दे पालकमंत्री गिरीश महाजन

  • पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंभमेळ्याच्या निधीचा राजकारणासाठी वापर
  • महायुतीतील पक्षांना पैशासोबत गुंडांची आवश्यकता.
  • महाराष्ट्रातील अनेक शहरा्ंची कायदा सुव्यवस्था अडचणीत
  • नुराकुस्ती खेळून जनतेला वेड्यात काढण्याचे प्रयत्न
  • सोयीस्कर मानसे बसविले जाते
  • वृक्षतोड हा पैसे खाण्यासाठीचा प्रयोग