पुणे शहरात जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या त्रासाला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप जवाबदार आहे . पालिकेत भाजपची सत्ता असताना कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळे पुणेकर नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा : पुणे : डेंग्यू, स्वाइन फ्लूचा ‘ताप’, आता करोना सौम्य ; विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

त्या पार्श्वभूमीवर पुण्यात बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहीजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेबाहेर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, पुणेकर नागरिकांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली. मात्र मागील पाच वर्षाच्या काळात त्यांना विकासकामे करण्यात अपयश आले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे आणि त्यात मागील तीन दिवस सुरू असलेला मुसळधार पाऊस, यामुळे नागरिकांनी प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहीजे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.