मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेत पवार कुटुंबावर चौफेर टीका केली होती. शरद पवार हे भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव घेत नाहीत असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यावर राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पुरंदरेंनी पोहचवले असं वाटत आहे त्यांना शाहू, फुले आणि आंबेडकर काय समजणार अशी अप्रत्यक्ष टीका केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. तिथं आपलं मनोगत व्यक्त करताना आव्हाडांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू, फुले यांना आदर्श मानून संविधान लिहिले आहे. म्हणजे शाहू, फुले यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळं या तिघांचं नाव घेतलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव घेतल्यासारखं आहे. हे समजण्यासाठी अक्कल लागते, त्यासाठी इतिहासाची पुस्तकं वाचा असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "गेले दोन चार दिवस महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाराष्ट्रातील विद्वान माणूस पवारसाहेब यांच्याबद्दल बोलला की छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव घेतच नाहीत. ते नेहमी फुले, शाहू, आंबेडकर म्हणत असतात. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पुरंदरेंनी पोहचवले असं वाटत आहे त्यांना शाहू फुले आंबेडकर काय समजणार?", पुढे ते म्हणाले की, "इतिहासकालीन पुरावे नसताना महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन महाराजांची समाधी शोधून काढली. तिच्यावरील पाला पाचोळा साफ केला. संबंध जगाला छत्रपती शिवाजी महाराज यांची वाट दाखवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. फुलेंनी जे कार्य केले त्यांचा प्रभाव, आदर्श शिवाजी महाराज होते. सती प्रथेची व्यवस्था समाजात होती, त्याच काळात शिवाजी महाराज यांनी आईला सती जाऊ दिलं नव्हतं. ते कर्मकांडाच्या कायम विरोधात होते. फुलेंची भूमिका शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित होती. त्यामुळे ते शिवाजी महाराज यांचे वारसदार होते. शाहू महाराज तर त्यांचे रक्ताचे वारसदार होते. म्हणून या दोघांना आदर्श मानतो आणि संविधान लिहितो असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा संविधानात आला. फुले, शाहू यांना संविधानात बंद केले. या तिघांचं नाव घेतलं तर शिवाजी महाराज यांच नाव घेतल्यासारखं आहे. पण हे समजायला अक्कल लागते". "मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काही चालतं. याची, त्याची नक्कल करा. इतिहास आणि पुस्तकं वाचा. फुलेंचं समाजातील योगदान तुम्हाला कळणार नाही," असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.