राज्य सरकार दुसऱ्याच गोष्टींमध्ये व्यग्र आहे. त्यांचे कशावरही नियंत्रण राहिलेले नाही. म्हणूनच पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचे धाडस होऊ शकले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. भाजपने राष्ट्रवादीची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ करण्यात येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

हेही वाचा >>> पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांची कृती समिती

काळेवाडीत पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, की पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा जर पुण्यात देण्यात आल्या असतील, तर ही अतिशय गंभीर घटना आहे. भाजपची राज्यात सत्ता असताना हे अधिकच गंभीर आहे. सरकारचे लक्ष कमी पडले. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने लक्ष्य केले आहे. कारण त्यांना राज्यात राष्ट्रवादीची अधिक भीती वाटते. विधिमंडळातील आपले संख्याबळ कमी होईल, असे भाजपला वाटते. १२३ संख्याबळ असणारा पक्ष १०५ वर आला. आगामी काळात ते ८० च्या खाली येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

हेही वाचा >>> ‘पीएफआय’बरोबरील रद्द करारावरून राजकारण; पुण्यात भाजप, राष्ट्रवादी यांची परस्परांवर टीका

मंत्र्यांची मस्ती वाढली
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सावंत यांच्या तोंडातून बोलतात. सावंतांचा आत्मविश्वास पाहता शिंदे-फडणवीस यांनी सावंतांना असे बोलण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. थोडक्यात काय, तर सरकारमधील मंत्र्यांची मस्ती वाढलेली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.