पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. महिनाभरापासून घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक कमी होत असून रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, फ्लॅावर, कोबी, मटार, पावटा या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : दुचाकीवरुन प्रवासी वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याला धमकी

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२ ऑक्टोबर) राज्य,तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून २ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, इंदूरहून २ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, गुजरातमधून ५ ते ६ टेम्पो भुईमूग शेंग, आग्रा, इंदूरमधून मिळून ७० ते ७५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.पुणे विभागातून सातारी आले १००० ते १२०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो साडेसात हजार ते आठ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, कांदा ५० ट्रक तसेच पुणे विभागातून नवीन बटाट्याची आवक बाजारात झाली.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील वाहतूक ११ तासांनी पूर्ववत

पालेभाज्या तेजीत
पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून पालेभाज्या खराब हाेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना दर मिळत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ३५ ते ४० रुपये आहेत. मेथीच्या एका जुडीचे दर २५ ते ३० रुपये आहेत. पालेेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात काेथिंबिरीच्या दीड लाख जुडी; तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली.कलिंगड,डाळिंब, चिकू, खरबूुजच्या दरात वाढ फळबाजारात कलिंगड, डाळिंब, चिकू, खरबुजच्या दरात वाढ झाली. लिंबाच्या दरात गोेणीमागे २०० रुपयांनी घट झाली. फळबाजारात कलिंगड १० ते १२ ट्रक, खरबूज ३ ते ४ ट्रक, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, केरळहून अननस ४ ट्रक, पपई २५ ते ३० टेम्पो, पेरु ५०० ते ७०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), डाळिंब ३५ ते ४० टन, माेसंबी ७० ते ८० टन, संत्री २५ ते ३० टन, सीताफळ २० टन, सफरचंद ८ ते १० हजार पेटी अशी आवक झाली. नवरात्रोत्सवामुळे फळांच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : श्वानावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप; डॅाक्टरकडे पाच लाखांची खंडणी मागणारे अटकेत

नवरात्रोत्सवामुळे फुलांना मागणी
नवरात्रोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून फुलांची आवक वाढली आहे. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. चांगल्या प्रतीच्या फुलांना मागणी वाढली आहे. चांगल्या प्रतीच्या फुलांच्या दरात वाढ झाल्याची माहिती फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली. दसऱ्यापर्यंत फुलांना चांगली मागणी राहिल.