पिंपरी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचा पिच्छा सोडत नाही, हे लक्षात आल्याने हतबल झालेल्या राज्य सरकारकडून फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रहाटणीत पत्रकारांशी बोलताना केली. आम्ही सरकारच्या दबावाला भीक घालत नाही. जेवढी दंडेलशाही करण्याचा प्रयत्न कराल, तेवढी भाजप कार्यकर्ते उसळी मारतील आणि राज्य सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणतील, असेही ते म्हणाले. दरेकर म्हणाले, ज्या पध्दतीने फडणवीस महाविकास आघाडी सरकारची लक्तरे काढत आहेत. त्यांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करत आहेत. त्यामुळे सरकार हादरून गेले आहे. राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करून अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात प्रचंड मोर्चा काढण्यात आला. निवडणुका झालेल्या पाचपैकी चार राज्यात भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. गोव्यात आपल्या रणनीतीचा वापर करून भाजपने सत्ता मिळवली. अशा परिस्थितीत, आपल्या पायाखालची वाळू घसरते आहे. फडणवीस आपला पिच्छा सोडत नाहीत, हे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे भाजपच्या बलस्थानावर घाव घालण्याच्या हेतूने सरकारकडून फडणवीस यांना नोटीस बजावण्याचा केविलवाणा प्रकार केला. मात्र, सरकारच्या तलवारीला धार नाही, याचे भान सरकारला राहिले नाही.