चिंचवड केएसबी चौक ते काळेवाडीला जोडणारा, १०० कोटींहून अधिक खर्चाचा व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला उड्डाणपूल डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही संबंधित कंपनीने आयुक्त राजीव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली आहे.
दीड किलोमीटर अंतराच्या या उड्डाणपुलाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. ३० महिन्यांची मुदत असताना अजूनही हे काम अपूर्ण आहे. पूल रखडल्याने रहिवाशी प्रचंड त्रस्त आहेत. स्थानिक नगरसेवक प्रसाद शेट्टी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत विचारणा केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काम मार्गी लागेपर्यंत स्थायी समितीचे कामकाज होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर, चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. तेव्हा डिसेंबपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे. कामाचा आढावा घेण्यासाठी दर १५ दिवसांनी बैठक होणार आहे, अशी माहिती नगरसेवक शेट्टी यांनी पत्रकारांना दिली. एम्पायर इस्टेटला दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रहिवाशांना त्रास होतो, याविषयी सातत्याने तक्रारी येत होत्या. मंगळवारी स्थायीच्या बैठकीत शेट्टी यांनी हा विषय काढला, तेव्हा आयुक्तांनी बैठकीनंतर थेट पाहणीचा निर्णय घेतला. त्यानुसार, पालिका व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांनी रस्त्याची पाहणी केली. रस्त्यावर दुतर्फा उभ्या-आडव्या लावण्यात येणाऱ्या मोटारींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.