राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं असतात. या वेळेला हे घड्याळ कायमचंच बंद करून टाकायचं आहे, असे आवाहन भाजपा मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होत्या.त्यांचं भाषण सुरू असताना रिंगरोड बाधित नागरिकांनी अचानक घोषणाबाजी केली. त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली होती. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यावर नियंत्रण मिळवलं.  यावेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधवसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

मुंढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काँग्रेसमुक्त देश तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार केला असून त्या शिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. अहंकार, अतिविश्वास हा राष्ट्रवादीच्या लोकांना आहे, सत्ता म्हणजे आमची मक्तेदारी आहे ती कोणीही मिळवू शकत नाही अस म्हणत पंकजा मुंडे राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. पंकजा मुंडे यांच भाषण सुरू असताना अचानक रिंगरोड बाधित नागरिकांनी तुम्ही आमच्या घरासाठी का आला नाहीत असा सवाल केला. तेव्हा, पंकजा मुंडे यांनी संबंधित व्यक्तीला खाली बसण्यास सांगितले. त्यानंतर ही तो व्यक्ती बोलतच होता.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी ने सिद्ध केल की, ते निवडणूक हरलेले आहेत. ज्या ठिकाणी हजारो लोक बसले आहेत. तिथे एक व्यक्ती उभा करून बोलवण्याचे हे त्यांचे धंदे जुने आहेत. हे जनता खपवून घेणार नाही. परत संबंधित व्यक्ती आणि महिलेला शांत राहा लोकशाहीमध्ये या गोष्टी असणे अपेक्षित आहेत अस म्हणत तुम्ही काहीही म्हटलात तरी तुमच्यावर पक्षाची छाप आहे हे विसरू नका अस मुंडे म्हणाल्या. माझ्या सभांमध्ये लोक पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न करता. अश्या प्रकाराला मुंडे साहेबांचे सैनिक घाबरत नाहीत. निवडणुकांपर्यंत आपला संयम सोडायचा नाही असेही त्या म्हणाल्या.