पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे.

गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने पाण्याचा साठा जलद गतीने वाढत होता. काल दिवसभरात झालेल्या २७ मिमी पावसाने धरणसाठा १०० टक्क्यांवर गेला. तर धरण परिसरात १ जूनपासून २ हजार ४३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ८.५१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. हैड्रोगेटद्वारे १ हजार ४५९.१९ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले आहे.

गेल्या वर्षीही ऑगस्ट महिन्यात पवना धरण भरले होते. यंदाही पाऊस चांगला झाल्याने धरण वेळेत भरले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे धरण भरले याचा आनंद शहरवासीयांना आहे तर बळीराजा मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.