राजकारणाकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा मांडण्यासाठी चाणक्य मंडल परिवार या संस्थेतर्फे ‘स्वतंत्र नागरिकांचा जाहीरनामा’ समोर ठेवण्यात येणार आहे. हा जाहीरनामा सर्व राजकीय पक्षांकडे पाठवून त्यातील तरतुदींचा पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात अंतर्भाव करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवजयंतीचे निमित्त साधून १९ मार्चला हा जाहीरनामा मांडण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, चित्रकार रवी परांजपे, संतसाहित्याचे अभ्यासक व लेखक डॉ. सदानंद मोरे, कार्यकर्ते अब्दुल कादिर मुकादम, हरी नरके आणि डॉ. विश्वंभर चौधरी या वेळी नागरिकांच्या अपेक्षांविषयी विवेचन करणार आहेत.धर्माधिकारी म्हणाले, ‘‘नागरिकांच्या जाहीरनाम्यात राष्ट्रीय सहमतीच्या विषयांचा अंतर्भाव आहे. कोणताही पक्ष, विचारधारा आणि निवडणुकीच्या राजकारणाशी संबंध नसलेल्या नागरिकांच्या अपेक्षा यात आहेत. स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनाचा आग्रह हा जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा आहे. केवळ अपेक्षा व्यक्त न करता त्यासाठी कायद्यात करावे लागणारे बदल आणि काही ठिकाणी करावी लागणारी घटनादुरूस्ती या गोष्टीही या जाहीरनाम्यात मांडण्यात आल्या आहेत.’’ ‘साप्ताहिक स्वतंत्र नागरिक’ सुरू करणारचाणक्य मंडल संस्थेतर्फे ‘साप्ताहिक स्वतंत्र नागरिक’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात येणार असून त्याच्या प्रथम अंकाचे प्रकाशनही १९ तारखेला करण्यात येईल. कायद्याच्या चौकटीत राहून नागरिकांनी आपले प्रश्न कसे सोडवता येतील, याबाबत हे साप्ताहिक मार्गदर्शन करणार आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिकांच्या समित्या तयार व्हाव्यात आणि त्याद्वारे इतरांना प्रशिक्षित केले जावे, असा या साप्ताहिकाचा उद्देश असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले. याचा पहिला टप्पा म्हणून संस्थेतर्फे ‘माहितीच्या अधिकाराचा वापर’ या विषयावर राज्यभर शिबिरेही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.