पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य विभागातील अधिकाऱ्यांची बदली केल्याने आयुक्त राजेश पाटील चर्चेत आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ४४ अधिकारी विशेष विभागात काम करत होते. त्यांची बदली आयुक्तांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाच्या विभागात हे अधिकारी कर्मचारी अनेक वर्षांपासून ठिय्या मांडून होते. मात्र कोविड काळानंतर शासनाने नुकतीच बदली करण्यास परवानगी देताच राजेश पाटील यांनी ४४ जणांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. "तीन, पाच, सात वर्षांपासून एकाच विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. बदल्या केल्यानंतर माझ्यावर राजकीय दबाव आलेला नाही. बदली झालेल्या व्यक्तींनी प्रत्येक विभागात काम केलं पाहिजे. असं माझं प्रांजळ मत आहे. दोन तीन वर्षांपासून बदल्या झाल्या नव्हत्या. सरकारने बदल्या करण्यास परवानगी दिलेली आहे त्यामुळं केल्या आहेत", असं आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितलं. नासाने शेअर केलेल्या फोटोवरून सोशल मीडियावर नेटकरी भिडले; कारण की… पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील हे काही महिन्यांपूर्वी रुजू झाले आहेत. पदभार स्वीकारताच कोविडने डोकं वर काढलं. या काळात त्यांनी काळजीपूर्वक निर्णय घेत काम केलं. दरम्यान, कोविड ओसरताच त्यांनी धडाकेबाज कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली केलीय. यामुळे महानगरपालिकेसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक अधिकारी हे राजकीय व्यक्तींच्या मर्जीतील होते त्यामुळे ते वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करत होते. यात ३ सह शहर अभियंते, ८ कार्यकारी अभियंते, २९ उपअभियंते, ४ सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.