पिंपरी- चिंचवड: शहरात गेल्या काही आठवड्यापासून नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे संभाव्य पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान सद्यस्थितीत जुलै पर्यंत पुरेल एवढाच पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. शहरातील बोअरवेलचे पाणी देखील आटले आहे. त्यात टँकरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. सोसायट्यामधील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा देखील बंद आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन वाढले आहेत. शुद्ध पाण्याचा गाड्या धुण्यासाठी वापर केला जात आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना पावसाळ्यापर्यंत शुद्ध पाणी देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महत्वाच्या उपाय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती. तीच आज ३५ लाख झाली आहे. परंतु, पाणी पुरवठा फक्त ३५ % ने वाढला आहे. तरी देखील महापालिकेच्या वतीने नागरिकांना वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, अनधिकृत पाणी वापरामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा अडथळा निर्माण होतो. यासाठी महापालिकेच्या वतीने महत्वाच्या उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये पंपाद्वारे थेट लाईन वरील पाणी खेचण्यास बंदी व असे आढळल्यास कारवाई, अनधिकृत कनेक्शन वर कडक कारवाई, रेन वॉटर हार्वेस्टिंगची देखभाल करणे, नवीन पाणी पुरवठा कनेक्शन साठी पुढील दोन महिने स्थगिती, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या व्यापारी वसाहती मधील पाणी पुरवठा थांबविण्याची शक्यता, गाड्या, रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पाणी पुरवठा विभागामार्फत होणार तपासणी…

महानगरपालिकेच्या पाईप लाईनवर थेट पंप लावून पाणी खेचणाऱ्या विरोधात कारवाई होणार आहे. कारवाई नंतर पाणी खेचताना दिसल्यास नळ कनेक्शन बंद करणार. बांधकाम साईट्स, कार वाॅशिंग सेंटर, यांची तपासणी होणार आहे. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेच्या माध्यमातून निर्मिंत पाण्याचा वापर न करणाऱ्या मॉल व सोसायट्यावर कारवाई होणार. पिण्याच्या पाण्याने गाडी व रस्ते धुणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

“शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेला सहकार्य करावे.”

प्रदीप जांभळे पाटील, प्रभारी आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका