देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरभरात १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संस्था आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमासह रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, ग्रंथोत्सव, प्रभातफेरी, स्वच्छता मोहिम आदी उपक्रमांचा समावेश आहे. १२ ऑगस्टला अ आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत, १३ ऑगस्टला ब आणि ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत, १४ ऑगस्टला ड आणि इ क्षेत्रीय कार्यालय आणि १५ ऑगस्टला क आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत पदयात्रा होईल. तसेच, कापडी पिशवी वापराबाबत फळे, भाजी विक्रेते, टपरी, हातगाड्यावरील विक्रेत्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी डिजिटल चित्ररथाचा वापर करण्यात येणार असून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, बचत गट, गणेश मंडळे, क्लब, गृहनिर्माण संस्था, नागरिक आणि इतर संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.