पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने खेड येथील भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी (एमएलडी) आणण्यासाठी अशुद्ध जलउपसा केंद्र, ब्रेक प्रेशर टँक (बीपीटी), भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू आहे. तळेगाव एमआयडीसीतील नवलाख उंब्रे येथील ‘बीपीटी’ उभारण्याचा खर्च पाच कोटी रुपयांनी वाढला आहे. सात कोटी ६८ लाख १४ हजार २११ रुपयांचे काम १२ कोटी ४० लाख ६७ हजार ३३६ रुपयांवर पोहोचले आहे.
भामा आसखेड धरणातून पाणी उचलून ते नवलाख उंब्रे येथील टाकीत (बीपीटी) साठवले जाणार आहे. तेथून ते पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. ‘बीपीटी’ उभारण्याचे काम २६ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. २.५ दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. तेथे १७००, १४००, १२५० आणि ९०० मिलिमीटर व्यासाच्या इनलेट, आउटलेट लोखंडी जलवाहिनी आणि १६०० मिलिमीटर व्यासाची आयसीसी वाहिनी टाकणे, पेव्हिंग ब्लॉक, सीमाभिंत बांधणे, ३५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ‘स्काडा’ प्रणालीसाठी इमारत बांधणे, अंतर्गत रस्ते व विद्युतविषयक कामे करण्यात येत आहेत. सद्य:स्थितीत ‘बीपीटी’चे ४० टक्के, तर सीमाभिंतीचे ५० टक्के काम झाले आहे.
तळेगाव एमआयडीसीकडून ही जागा आठ ऑक्टोबर २०२४ ला महापालिकेच्या ताब्यात आली. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला आठ महिने काम करता आले नाही. खड्डे असल्याने जागा समतल करून घेण्यासाठी भराव टाकण्यात आला. तसेच ‘बीपीटी’च्या कामात अतिरिक्त कामाचा समावेश करण्यात आला. ‘स्काडा’साठी ३५ ऐवजी ७० चौरस मीटर आणि रखवालदार निवास व्यवस्थेसाठी ४० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन स्वतंत्र इमारती बांधण्यात येणार आहेत. फर्निचर, मुख्य प्रवेशद्वारासाठी आरसीसी कमान आवश्यक आहे. सीमाभिंतीखाली आरसीसी काम केले जाणार आहे. वाहनतळ शेड, गोदाम बांधण्यात येणार असल्याने खर्चात वाढ झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
प्रकल्पाची जागा ‘एमआयडीसी’कडून ताब्यात येण्यास विलंब झाला. जागा ताब्यात आल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे होते. खड्डे भरणे, सीमाभिंत बांधणे, सुरक्षारक्षकासाठी स्वतंत्र इमारत बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. या कारणांमुळे प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
