पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा अभ्यास आणि लेखनात बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक दशके व्यतीत केली. इतिहास आणि भारतीय संस्कृतीच्या प्रसारातील आयुष्यभराच्या योगदानासाठी देश त्यांच्या ऋणात राहील. नि:स्वार्थी सेवेसाठी बाबासाहेब सदैव देशाचे आदर्श राहतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी बाबासाहेबांचे पुत्र अमृत पुरंदरे यांना पत्र पाठवून शोक व्यक्त केला. बाबासाहेबांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर पंतप्रधानांकडून ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी पंतप्रधानांकडून अमृत पुरदंरे यांना ईमेलद्वारे पत्र आले. बाबासाहेबांच्या लेखनातून शिवाजी महाराजांची कामगिरी अनेक पिढय़ांना समजली. भारतीय इतिहासातील गौरवशाली काळाविषयीची अकादमिक दृष्टी त्यांच्या अद्वितीय ग्रंथसंपदेतून मिळाली, तसेच इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले. असा समतोल एखाद्या इतिहासकाराकडून साधला जाणे दुर्मीळ आहे. ‘जाणता राजा’ या नाटकाच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कहाणी जिवंत केली. देशात या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले, त्याचे अनेक भाषांत भाषांतर झाले. या नाटकामुळे जगातील अनेक लोकांना शिवाजी महाराजांची ओळख झाली. या नाटकाच्या पुण्यातील प्रयोगाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आणि बाबासाहेबांची ती भेट संस्मरणीय आहे, असे मोदी यांनी या पत्रात म्हटले आहे.