पुणे : कच्च्या मालाच्या तुटवडय़ामुळे पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तर किलोमागे दोन ते तीन रुपयांनी ही वाढ झाली आहे. कच्चा माल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे दर तेजीत राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरापासून जीवनावश्यक वस्तू तसेच खाद्यान्नाच्या दरात वाढ होत चालली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलांचे दर तेजीत आहेत. इंधन दरवाढीमुळे बहुतांश सर्व अन्य मालाच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो पोह्यांच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याची माहिती ‘मार्केट यार्ड‘मधील व्यापारी सुमीत गुंदेचा यांनी दिली. अद्याप देशभरात सर्वत्र मोसमी पाऊस सक्रिय झाला नाही. पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे. बाजारात कच्च्या मालाचा (धान किंवा पॅडी) तुटवडा जाणवत आहे. पोह्यांचे उत्पादन गुजरात आणि मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठय़ा प्रमाणावर केले जाते. कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याने तेथील उत्पादक तसेच प्रक्रिया उद्योजकांनी (मिल) दरात वाढ केली आहे. जोपर्यंत कच्चा माल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत पोह्यांचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. वर्षभर मागणी.. पातळ पोहे, दगडी पोहे हे चिवडा तयार करण्यासाठी वापरले जातात. साध्या पोह्यांचा वापर नाश्त्यासाठी केला जातो. त्याला वर्षभर पोह्यांना मागणी असते. उपाहारगृहचालक, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच घरगुती ग्राहकांकडून वर्षभर पोह्यांना मागणी असते. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह, कोकणातील रोहा आणि पेण येथून पोह्यांची आवक होते. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज १० ते १५ ट्रक पोह्यांची आवक होते, एका ट्रकमध्ये एक टन पोहे असतात, असे मार्केट यार्डातील पोहे व्यापारी सुमित गुंदेचा यांनी नमूद केले. किरकोळ बाजारात एक किलो पोह्यांचे दर (रुपयांत) पातळ पोहे ४२ ते ४५ दगडी पोहे ३२ ते ३८ साधे पोहे ३५ ते ४२