पुणे : ‘सराइतांवर दाखल किरकोळ स्वरूपाचे गुन्हे अदखलपात्र स्वरूपात (नाॅन काॅग्निजेबल ऑफेन्स – एनसी) मोडतात. मात्र, अशा गुन्ह्यांतील बारकावे तपासून पाहावेत. गुन्हेगारांना मोकळे न सोडता त्यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करावेत,’ असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
दखलपात्र गुन्हे दाखल केल्यास सराइतांवर भविष्यात करण्यात येणारी कारवाई परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. ‘शहरातील गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांविरुद्ध कारवाईसाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील ३७ हजार सराइतांचे वास्तव्याचे ठिकाण, त्यांचे नातेवाइक, तसेच अन्य माहिती संकलित करण्याचे काम सुुरू करण्यात आले आहे.
गुन्ह्यांचे स्वरूप विचारात घेऊन ३७ हजार सराइतांची माहिती १५ विभाग करून संकलित करण्यात आली आहे. त्यांपैकी ४,४०० गुंड पोलिसांच्या सर्वोच्च यादीत (टाॅप लिस्ट) आहेत. शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला गुन्हेगारांची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सराइतांची यादी देण्यात आली असून, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.
‘बऱ्याचदा सराइतांकडून नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे असे गुन्हे केले जातात. अशा प्रकारचे गुन्हे अदखलपात्र स्वरूपात मोडतात. मात्र, आता अशा प्रकारचे गुन्हेही नीट तपासून सराइतांविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. गुन्हेगाराविरुद्ध दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यास त्याच्याविरुद्ध भविष्यात ‘एमपीडीए’ (झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा), ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा), तसेच तडीपारीची कारवाई अधिक परिणामकारक पद्धतीने करता येईल,’ असे बलकवडे यांनी नमूद केले.
तडीपार गुंडांवर नजर
दहशत माजविणाऱ्या गुंडांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले जाते. तडीपार केल्यानंतर सराईत पुन्हा शहरात वास्तव्यास येत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या तीन वर्षांत जवळपास ८०० गुंडांनी तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याचे आढळून आले आहे. तडीपार केल्यानंतर शहरात वावरणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
गुंडांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन
‘शहरातील वस्ती भागातील रहिवासी, व्यापाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार घडतात. गुंडांनी धमकाविल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी,’ असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी केले. ‘शहरवासीयांमध्ये विश्वास निर्माण करणे, तसेच त्यांना आधार देण्यासाठी वस्ती भागात पोलिसांनी बैठका घेऊन मार्गदर्शन करावे,’ अशा सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.