मोशी टोलनाका ते जय गणेश साम्राज्य चौकादरम्यान रस्त्यांच्या दोन्ही बाजूंची अतिशय दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी अपघातांचा धोका असून त्यामुळे येथील रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मोशी टोलनाका ते जय गणेश साम्राज्य चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत तेथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या साईडपट्ट्यांची उंची कमी झाली आहे. सदरचा चिखल रस्त्यांवर येऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या साईडपट्ट्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या मागणीकडे लक्ष देऊन तातडीने दुरूस्तीचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.