पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने बटाट्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ३ टेम्पो मटार, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण, इंदूर येथून ९ ते १० टेम्पो गाजर अशी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७५ ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली
कोथिंबीर, कांदापात, करडईच्या दरात वाढ
आवक घटल्याने कोथिंबीर, कांदापात, करडई या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. शेपू, पालकच्या दरात घट झाली आहे. मेथी, चाकवत, पुदिना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या एक लाख जुडींची, तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली. पालेेभाज्यांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – १००० ते २०००, मेथी – १००० ते १५००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात – १००० ते १८००, चाकवत – ५०० ते ८००, करडई -५०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका – ५०० ते १०००, चवळई – ३०० ते ७००, पालक -१५०० ते २०००
डाळिंब महाग
फळ बाजारात डाळिंबाची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक फळबाजारात मोसंबी ३० ते ४० टन, संत्री एक ते दीड टन, डाळिंब ४० ते ४५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू १०० खोकी, पेरू ६०० ते ७०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ २ ते ३ टन, तसेच केरळहून ५ ट्रक अननस अशी आवक झाली.