पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे मत पुणे : शिक्षणाचे रूपांतर ज्ञानात, तर ज्ञानाचे रूपांतर कौशल्यात करून अनुभवावर आधारित शिक्षणाच्या पद्धतीवर भर दिला गेला पाहिजे, असे मत राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवी प्रदान कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. बं. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. अश्विनी कुमार शर्मा आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ३९५ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर आरती संदीप गावंडे, समीर अशोक बागल यांना कुलपती सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. यंदापासून सुरू केलेल्या आत्मनिर्भर पुरस्कारांद्वारे अन्य विद्यार्थीही प्रेरणा घेऊन यशस्वी उद्योजक होतील आणि इतरांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करतील. आत्मनिर्भर पुरस्कार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्कील इंडिया व्हिजनला बळ देणारे आहेत, असे डॉ. मुजुमदार म्हणाल्या. विद्यार्थ्यांना पुरस्कार विद्यापीठातील अल्पकालीन कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:चा व्यवसाय सुरू केलेल्या, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवलेल्या रुसाना नजीर शेख, रेणू मनोज शर्मा, अमिता अशोक माने, शुभम शेंडे, अक्षय भंडारी या विद्यार्थ्यांना कुशल पुरस्कार देण्यात आला. न्यूट्रिनिक्स हा उद्योग सुरू करून १५ लाखांची उलाढाल करणाऱ्या निकिता आज्र्योनी, आनंद ऑटोमेशन या उद्योगाद्वारे ६० लाखांची उलाढाल करणाऱ्या तेजस आनंद यांना आत्मनिर्भर पुरस्काराने गौरवण्यात आले.