विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गेल्या दीड वर्षात शहरातील १११ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचा >>>पुणे: राजभवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वराज्य पक्षाची निदर्शने; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात विश्रांतवाडीतील टोळीप्रमुख राज रवींद्र भवार (वय २४), जयेश उमेश भोसले (वय १९, दोघे रा. पत्र्याची चाळ, धानोरी रस्ता, विश्रांतवाडी), सुमीत सुभाष साळवे (वय १९, रा. रामवाडी, येरवडा), गौरव सुनील कदम (वय २२ रा. छत्रपती शाहू सोसायटी, धानोरी रस्ता, विश्रांतवाडी), अकबर अयुब शेख (वय २१, रा. वडार वस्ती, विश्रांतवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज भवार आणि साथीदारांनी विश्रांतवाडी भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. भवार आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी तयार केला होता. या प्रस्तावास अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त शशीकांत बोराटे यांनी नुकतीच मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे तपास करत आहेत