पुणे : ‘वैकुंठ स्मशानभूमीत पाणी, स्वच्छता, पुरेसे विद्युत दिवे अशा सुविधांची वानवा जाणवत असून, येथे येणाऱ्या नागरिकांना भटक्या श्वानांचा त्रासही सहन करावा लागत आहे. या ठिकाणी असलेल्या असुविधांची तक्रार महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, येथील भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे भटके श्वान तोडत असल्याचा एक व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मात्र, काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर हे मृतदेहाचे तुकडे नसून, पाव असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘एचएमपीव्ही’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका दक्ष; आठ रुग्णालयांमध्ये व्यवस्था

दत्तवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वैकुंठात सर्वाधिक अंत्यविधी होतात. या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून, अंत्यंविधीसाठी येणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वैकुंठाच्या स्वच्छतेची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. तर, इतर व्यवस्थापन आरोग्य विभाग सांभाळते. विद्युत आणि गॅस दाहिन्यांसह, प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची जबाबदारी विद्युत विभागावर असते. यामुळे प्रत्येक वेळी हे तिन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जाबाबदारी झटकत असल्याची तक्रार केली जात आहे.

हेही वाचा >>> अफू विक्री करणारा गजाआड; राजस्थानातील तरुणाकडून दोन लाखांची अफू जप्त

वैकुंठात दररोज स्वच्छता होणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा असणे आवश्यक आहे, सुरक्षेसाठी तसेच नागरिकांना मदतनीस आवश्यक आहे. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याची तक्रार केली जात आहे. या ठिकाणी भटक्या श्वानांचा वावर वाढत चालला आहे. अनेक भटके श्वान असून, त्यांचा बंदोबस्त करण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे चित्र आहे. वैकुंठातील देखभाल दुरुस्तीच्या निविदांसाठी मात्र हे विभाग एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचा आरोपही केला जात आहे. भटक्या श्वानाने मृतदेहाचे तुकडे तोडल्याचा व्हीडीओ समोर आल्याने एकच गोंधळ उडाला.

सहायक आरोग्य प्रमुख डॉ. राजेश दिघे म्हणाले, या प्रकाराची मला माहिती नाही. मला बातमीद्वारे हा प्रकार समजला. आरोग्य विभागाकडे स्मशानभूमीचे व्यवस्थापन असले, तरी दहनाची संपूर्ण जबाबदारी विद्युत विभागाची आहे. त्यांनाच याची माहिती असेल. वैकुंठातील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि विद्युत दाहिनी चालू-बंद करणे एवढीच जबाबदारी आमची आहे. इतर सर्व व्यवस्थापन क्षेत्रीय कार्यालय आणि आरोग्य विभागाचे आहे. त्यांना स्वतंत्र मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems of stray dogs facing by residents apart from lack of facilities at vaikunth crematorium pune print news ccm 82 zws