राहुल खळदकर साडेबारा कोटी टनांपेक्षा अधिक उत्पादनाचा अंदाज पुणे : देशभरात यंदा भाताची लागवड ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून हंगामात तांदळाचे उत्पादन साडेबारा कोटी टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांतील तांदूळ उत्पादनाचा विचार करता यंदाच्या हंगामातील उत्पादन ५० ते ६० लाख टनांनी वाढून ते विक्रमी ठरेल. देशातील सर्व राज्यांत भाताची लागवड कमी-अधिक प्रमाणावर केली जाते. गेल्या वर्षी २०२० मध्ये खरीप हंगामात भाताची पेरणी ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. यंदाही गतवर्षी एवढी भाताची लागवड झालेली आहे. अजून काही भागात लागवड होणार आहे. यंदा पेरणी वेळेवर झालेली आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत तांदळाच्या वेगवेगळ्या जातींचे उत्पादन हाती येईल. हवामानातील बदल किंवा अतिवृष्टी न झाल्यास यंदा तांदळाचे उत्पादन वाढेल, अशी शक्यता फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष,पुणे मार्केट यार्डातील जयराज कंपनीचे संचालक तांदूळ व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केली. खरीप हंगामात देशभरात पिकांची लागवड ११२५ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. त्यात प्रामुख्याने भात, कडधान्ये, तेलबिया, कापूस, मका, डाळींचा समावेश असतो. यंदा आतापर्यंत १०७५ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरासरीप्रमाणे यंदाही खरीप पिकांची पेरणी होईल. गेल्या वर्षी देशात तांदळाचे उत्पादन ११ कोटी ९८ लाख टन एवढे झाले होते. ते यंदा साडेबारा कोटी टनांपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे. हंगामाच्या आरंभी भाववाढ. तांदळाचे उत्पादन जरी मुबलक झाले, तरी यंदाच्या हंगामात सुरुवातीला तांदळाला चांगले भाव मिळतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे तांदळाची निर्यात कमी झाली होती. प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडून (राइस मिल) तांदळाची खरेदी कमी प्रमाणावर झाली होती. करोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तांदळाच्या मागणीत वाढ होईल. उपाहारगृहे, खाणावळी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत तांदळाच्या मागणीत वाढ होईल. त्यामुळे यंदाच्या हंगामात सुरुवातीला तांदळाच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होईल, असे तांदूळ व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले. यंदा काय? देशातील प्रत्यक्ष तांदूळ उत्पादनाची आकडेवारी डिसेंबर महिन्यात उपलब्ध होईल. विविध राज्यांत भात लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सुरू असते. अतिवृष्टी न झाल्यास यंदा भारतात तांदळाचे उत्पादन साडेबारा कोटी टनांपेक्षा जास्त होईल. गेल्या काही वर्षांचा विचार करता देशात पहिल्यांदाच साडेबारा कोटी टनांपेक्षा जास्त तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता तांदूळ व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केली. थोडी माहिती. ’गेल्या वर्षी चीनमध्ये १४ कोटी ८३ लाख टन एवढे तांदळाचे उत्पादन झाले होते. ’बासमती तांदूळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. बासमती वगळता अन्य तांदळाच्या उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर आहे. ’चीन पाठोपाठ भारतात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन होत असून जगभरात तांदूळ उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.