खडकवासला गाव आणि उत्तमनगर-कुडजे गावाला जोडणारा रस्ता दोन कालव्यांवरून जात असून, या कालव्यांना कठडे नसल्याने तिथे अपघाताची शक्यता वाढली आहे. या कालव्यांमधून शाळकरी मुले, तसेच नागरिक ये-जा करत असल्यामुळे तिथे कठडे बसवावेत, अशी मागणी त्या भागातील कार्यकर्ते नरेंद्र मते यांनी केली आहे.
खडकवासला गाव ते उत्तमनगर-कुडजे हा रस्ता जुना मुठा डावा कालवा (बेबी कॅनॉल) आणि नवीन मुठा उजवा कालवा यांच्यावरून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दिशेने जातो. तेथूनच जवळ असणाऱ्या शाळेतील मुलांना न नागरिकांना हाच रस्ता वापरावा लागतो. रस्ता ज्या ठिकाणी कालव्यांवरुन जातो त्या ठिकाणी कोणताही कठडा नसल्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या आणि कालव्यांमधून जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. कठडय़ाच्या बांधकामास परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच कठडय़ांबरोबर इतर आवश्यक बांधकामही करण्यात यावे, अशी मागणी मते यांनी केली आहे.