पिंपरी : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी, ‘मला ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ का करता,’ असा प्रतिसवाल केला.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला फडणवीस उपस्थित होते. त्या वेळी फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले, ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्याबाबत मला माहिती नाही. याबाबत सुप्रिया सुळे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच विचारावे.’

दरम्यान, ‘भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सुरक्षाविषयक आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यांना माहिती आणि साधने पुरविण्यात येत आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, ‘राज्यात दक्षता घेण्यासाठी कालच बैठक घेतली आहे. आवश्यक त्या सूचना पोलीस, प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व खबरदारी घेतली जात आहे. सर्व प्रकारचा समन्वय राखला जात आहे. जिल्ह्याला योग्य प्रकारे माहिती, साधने दिली जात आहेत.’