पिंपरी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते मामुर्डी या पट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन आठ ठिकाणी ‘बॉक्स स्ट्रक्चर’ (अंडरपास) उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्याबाबतची तांत्रिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह , किवळे , रावेत, पुनावळे, ताथवडे, आणि वाकड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या भागातील गंभीर वाहतूक समस्या मांडली. वाकड ते मामुर्डी दरम्यान गेल्या काही वर्षांत आयटी पार्क, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहप्रकल्पांमुळे नागरीकरण वाढले आहे. मात्र, महामार्गाची अपुरी क्षमता आणि ग्रेड सेपरेटरच्या अभावामुळे स्थानिक वाहतूक व महामार्गावरील वाहने एकमेकांत मिसळल्याने तासनतास कोंडी होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी अशा एकूण आठ महत्त्वाच्या ठिकाणी नवीन अंडरपास व ‘बॉक्स स्ट्रक्चर’ प्रस्तावित आहेत. या कामांमुळे महामार्ग क्रॉसिंग करणे सुकर होईल आणि सेवा रस्त्यांवरील भार कमी होईल, असे आमदार शंकर जगताप म्हणाले.

गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संथ गतीच्या कामांमुळे वाकड आणि रावेत परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी जगताप यांनी केली. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आमदार जगताप यांनी सुचवलेल्या आठ अंडरपासबाबत शासनाकडून तांत्रिक तपासणी सुरू असून लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील.

हिंजवडी आयटीपार्कसह , किवळे , रावेत, पुनावळे, ताथवडे, आणि वाकड हा परिसर शहराच्या विकासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महामार्गावरील रस्त्यांच्या संदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे आणि नवीन आठ ठिकाणी अंडरपास उभारणे हाच यावरील कायमस्वरूपी उपाय आहे. विधानसभेत हा प्रश्न मांडल्यानंतर शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही कामे लवकरात लवकर मार्गी लावून मी हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार शंकर जगताप म्हणाले.