भीमा नदीतील जलपर्णीत अडकल्याने पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई गावात ही घटना घडली. मल्हारी शेलार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मल्हारी शेलार हे भीमा नदीवर वीजपंप चालू करण्यासाठी गेले असताना जलपर्णीत अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या परिसरात मोठ्याप्रमाणात जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे मृतदेह शोधण्यात अडचण येत होती. पुणे शहरातून येणारं सांडपाणी मुळा-मुठा नदीत मिसळते आणि हेच पाणी पुढे भीमा नदीत जमा होते. त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागात नदीवर जलपर्णीचे मोठे आवरण तयार झाले आहे. हे सांडपाणी भीमा नदी प्रक्रिया केल्याशिवाय सोडता येत नाही. परंतु, या नियमाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. भीमा नदीच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकारने 'नमामि चंद्रभागा' या प्रकल्पाची घोषणा केली आहे. मात्र अद्याप याचे कार्य सुरू झालेले नाही.