महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हं दिसत आहेत. याच कारणामुळे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही असं सांगितलं आहे. मात्र त्यावेळी त्यांनी आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर आपण नेमकी काय भूमिका घ्यावी याबद्दल फार संभ्रमात असल्याचंही मोरेंनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”

पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढलीय का असा प्रश्न वसंत मोरेंनी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीय. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं. पुढे बोलताना मोरे यांनी, “राज ठाकरेंनी जो शब्द वापरला तो, ‘जर मशीदींवरील भोंगे काढले नाही तर..’ असा होता. मी स्टेजवर होतो, मी भाषण ऐकलं आहे. तर भोंगे कुणी काढायचे आहेत. सरकारने भोंगे काढायचेत. सरकारने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी,” असं म्हटलंय. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

नक्की वाचा >> “भोंगे काढा बोलल्यानंतर दंगल व्हावी अशी काय परिस्थिती आलीय? दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला…”; मनसेचा हल्लाबोल

स्थानिक पातळीवर भोंग्यांविरोधातील भूमिका ही वसंत मोरे यांना त्यांच्या तसेच साईनाथ बाबर यांच्या वॉर्डमध्ये पक्षाच्या विरोधात जाणारी ठरु शकते असं वाटतं असल्याचंही म्हटलंय. “आमची भूमिका ही वादग्रस्त भूमिका ठरु शकते. त्याचा परिणाम लोकप्रितिनीधी म्हणून निवडून येताना होऊ शकतो. मी झालं साईनाथ (बाबर) झालं. साईनाथच्या वॉर्डात ७० टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. आम्ही त्यांच्यात जाऊन असंख्य कामं केलेली आहेत.
राज ठाकरेंची भूमिका चुकीची नाही. मला भूमिकेबाबतीत नाही तर कार्याकर्त्यांनी थोडं शांततेनं घेतलं पाहिजे असं वाटतं,” असं स्पष्ट मत मोरे यांनी व्यक्त केलंय.

नक्की पाहा >> Video: भाषण सुरु असतानाच अजान सुरु झाली अन् गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी…; शिरुरमधील सभेतील व्हिडीओ चर्चेत

“रमजानचा माहिना सुरु आहे. या दिवसांमध्ये पोलीस १४९ कलम लगेच लावतात. पोलिसांनी मला बोलवून विचारलं होतं की काय भूमिका घेणार आहात का. मला काय भूमिका घेऊ हेच कळलं नाही,” असंही मोरे यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे त्यांनी, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंही म्हटलंय.

नक्की वाचा >> “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही…”; नारायण राणेंनी केली राज ठाकरेंची पाठराखण

“माझा आणि साईनाथचा संपर्क झाला नाही. साईनाथला फोन आले असतील. मला फोन आले. काल एक गट मला येऊन भेटला. त्यांनी मला विचारलं असं काही आहे का. तर त्यावर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागामध्ये शांततता कशी राहील हेच मी पाहील. मी त्या भूमिकेसाठी ठाम आहे,” असं मोरे यांनी थेटपणे सांगितलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

पुण्यातील महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरेंनी घेतलेली ही भोंग्याविरोधातील भूमिका स्थानिक पातळीवरील राजकारणासाठी मनसे नेत्यांना अडचणीची वाटू लागल्याने आता राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना, नेत्यांना विश्वासात घेऊन ही भूमिका घेतली नव्हती का यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.