पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या रस्त्यावर उड्डाणपूल तसेच मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. वाहनचालक तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते.

बाणेर, बालेवाडी यासह हिंजवडी आयटी पार्क कडे जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्याचा वापर नागरिकांकडून केला जातो. हिंजवडी येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मात्र या रस्त्यावर होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येमुळे नोकरदार हैराण झाले आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थाकडे जाण्यासाठी देखील गणेशखिंड रस्त्याचा वापर केला जातो.

या रस्त्यावरील आनंदऋषीजी चौकात (पुणे विद्यापीठ चौक) येथे काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला उड्डाणपूल पाडून टाकण्यात आला असून येथे नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. तसेच या रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम देखील गेल्या काही वर्षापासून सुरु असल्याचे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना सुरू करण्यात आले आहेत. काही चौकातील यू टर्न बंद करण्यात आले असून याचा फायदा वाहतूक सुरळीत होण्यासाठी होत असल्याचे समोर आले आहे.

याच रस्त्यावर असलेल्या कृषी महाविद्यालया समोरील उड्डाणपुलाबाबत महत्त्वाचा निर्णय आता महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या उड्डाणपुलाची एक बाजू आता वाहन चालकांसाठी बंद ठेवली जाणार आहे. या उड्डाणपुलाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुणे महानगरपालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाची एक बाजू रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी बंद ठेवली जाणार आहे. याची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

काय केले जात आहे काम ?

महापालिकेने या उड्डाणपुलावरील १४ बेअरिंग बदलण्याचे काम यापूर्वी पूर्ण केले आहे. मात्र, दिवसभर या पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने पुलाच्या सांध्यांचे काम प्रलंबित राहिले आहे. हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची स्थिती अधिकच मजबूत होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली. पुढील महिनाभर हे काम सुरू राहणार आहे.

कोणत्या वेळेत राहणार वाहतूक बंद ?

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने दिवसा काम करणे अशक्य आहे. महापालिकेने हे काम दिवसाच्या वेळेस सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत भर पडून त्याचा त्रास नागरिकांना तसेच वाहन चालकांना होणार आहे. त्यामुळे दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत या उड्डाणपुलाचा एक मार्ग बंद राहणार आहे. एक महिन्याच्या काळात रात्रीच्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या दोन पैकी एक मार्ग बंद बंद ठेवला जाईल. टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे असे, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.