पुणे : कालव्याशेजारी पार्टी करताना झालेल्या वादातून दोघांनी मित्राला वाहत्या पाण्यात ढकलून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या वर्षी हडपसर भागात ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास करून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, छत्रपती संभाजीनगर) आणि अशिष यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार (वय ३६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ४ मे रोजी विनोद, वैभव आणि आशिष हे हडपसर भागातील उन्नतीनगर परिसरातील कालव्याजवळ पार्टी करण्यासाठी गेले होते. तिघांनी तेथे दारू प्यायली. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपी वैभव आणि आशिष यांनी विनोदला वाहत्या पाण्यात टाकून दिले. पाण्यात बुडून विनोद याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.
विनोद यांच्या पत्नीने पतीचा खून झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोघांची चौकशी केली. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबतचा अहवाल पोलिसांकडे सादर केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.