पुणे : मूल होत नसल्याने एकाने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी पतीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.या प्रकरणी देवानंद मिच्छद काळेल (वय ३०, रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली. काजल देवानंद काळेल (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. काजलचे वडील मारूती बाड (रा. कोनगाव, जि. ठाणे) यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवानंद मूळचा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवासी आहे. त्याचा दोन वर्षांपूर्वी काजलशी विवाह झाला होता. विवाहानंतर मूल होत नसल्याने त्याने काजलचा छळ सुरू केला. दोन दिवसांपूर्वी रात्री दोघांची भांडणे झाली. त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. देवानंदला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.