पुणे : महापालिकेच्या विविध कार्यालयांत विद्युत शेगड्यांचा वापर केला जात असल्याने महपाालिकेला विजेचे अतिरिक्त बील येत आहे. विभागांकडून विजेचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारींची दखल अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी घेतली आहे. विद्युत शेगड्यांचा वापर तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जे अधिकारी, कर्मचारी विजेचा अतिरिक्त वापर करत असल्याचे समोर येईल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या विविध कार्यालयांमध्ये अनावश्यक वीज वापराबाबत महापालिकेतील सभासद तसेच नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. कार्यालयीन कामांकरीता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून, अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळावा, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर संबंधित विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्रणा, उद्वाहन उपकरणे बंद करावीत. तसेच, वातानुकूलित यंत्रणेचे तापमान २४-२६ अंशावर ठेवावे, असे राज्य सरकारच्या आदेशात नमूद आहे.

महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांकडून सर्रासपणे विद्युत शेगड्यांचा वापर केला जातो. या विद्युत शेगड्यांच्या वापरामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या विजेच्या बिलात मोठी वाढ झाली आहे. तसेच अधिकारी आणि महापालिकेतील पदाधिकारी कार्यालयात नसताना देखील विजेचे पंखे, वातानुकूलीन यंत्रणा, विजेचे दिवे सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विजेचा विनाकारण होत असल्याच्या तक्रारी अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी हे आदेश काढले आहे.

महापालिकेतील विभाग प्रमुख आणि पदाधिकारी बैठकांसाठी बाहेर गेलेले असताना संबंधित कार्यालयात विजेचा वापर सुरू असतो. पंखे, विजेचे दिवे सुरूच असतात हे पाहणीमध्ये समोर आले आहे. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सर्व कार्यालयातील विद्युत शेगड्यांचा वापर तातडीने बंद करण्यात यावा. विजेची बचत करावी. प्रत्येक कार्यालयाने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांमधून एका कर्मचाऱ्याची नेमणूक समन्वयक म्हणून करावी. समन्वयकाने कार्यालय सोडताना वीज उपकरणे बंद असल्याची खात्री करणे अपेक्षित आहे. कार्यालयातील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, विविध विद्युत उपकरणे ही विनाकारण चालू राहणार नाहीत, याची दखल घ्यावी. तसेच विजेचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर प्रशासकीय नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.