पुणे : ‘पावसाळापूर्वीच्या कामांची तयारी करताना सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. आपत्ती निवारणासाठी प्रभागाच्या पातळीवर पथके तयार करून पावसाळापूर्वीच्या कामांबाबत सर्व संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक घ्यावी,’ असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी  प्रशासनाला दिले.

आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळापूर्व कामांसंदर्भात महापौर नागपुरे यांनी बैठक घेतली. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पवनीत कौर व ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त माधव जगताप यांच्यासह विविध विभागांमधील वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करताना समाविष्ट गावांसह संपूर्ण शहराचे सूक्ष्म नियोजन केले जावे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणती कामे करणे आवश्यक आहे, हे ठरविण्यासाठी महापालिका प्रशासन, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, महावितरण, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कटक मंडळांची तातडीने एकत्रित बैठक घ्यावी.

ओढे, नाल्यांची सफाई, कल्व्हर्टची दुरुस्ती व सीमा भिंती यांची कामे वेळेत पूर्ण करावीत. पावसाळी गटारे, ओढे, नाल्यांचे मॅपिंग पूर्ण करावे. धोकादायक वाडे, इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना नोटीसा देण्यात याव्यात. अशा सूचना महापौर नागपुरे यांनी बैठकीत केल्या.

टेकडीवरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ठिकाणी चर खोदून पाणी जिरवावे. निचरा न झालेले पाणी ओढा-नाल्यामार्फत नदीत जाण्यासाठीचे नियोजन करावे. समाविष्ट गावातील नकाशानुसार व्यवस्थितपणे नाले बांधून घ्यावेत. पावसाळी वाहिन्या शक्यतो पदपथांच्या खालून घ्याव्यात, नियमित बैठका घेतल्या जाव्यात, अशी सूचना विरोधी पक्षनेते निकम यांनी केली.

एका ठेकेदाराला तीनच कामे

पावसाळापूर्व कामांसाठी ठेकेदारांकडून पूर्वगणन पत्रापेक्षा कमी दराने निविदा येतात. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही, हे वारंवार समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी देखील महापालिका प्रशासनाकडे दरवर्षी येतात. त्यामुळे यंदा प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे ठरविले आहे. ‘पावसाळी कामे देताना एका ठेकेदाराला अधिकाधिक तीनच ठिकाणची कामे दिली जाणार आहेत. त्यामुळे संबधित ठेकेदारावर कामाचा ताण देखील येणार नाही आणि कामांचा दर्जाही राखला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले.

महापौरांनी दिल्या महत्वाच्या सूचना

– नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी जलद प्रतिसाद तुकड्यांची (क्यूआरटी) नियुक्ती करावी.

– कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’मार्फत प्रशिक्षण द्यावे

– प्रभाग आणि क्षेत्रीय कार्यालय पातळीवर नियोजन करा

– शहरासह समाविष्ट गावातील पूर व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ दिले जावे.

– पूर येणाऱ्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत