करोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारने पाच स्तर निश्चित केले आहेत. या स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून, पुण्यातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली. पुण्यातील मॉल्स आणि दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून हे निर्णय लागू होणार आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हे लागू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निर्बध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी सोमवारपासून लागू केल्या नियमांची माहिती दिली. नियमावलीचं पालन करून मॉल्स सुरू करण्यास तसेच दुकानंही ४ वाजेऐवजी ७ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा- अरे पोलिसांची कामं अशी करतोस; अजित पवारांनी ठेकेदाराची केली कानउघाडणी

सोमवारपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र, सोमवारपासून ही परवानगी देण्याआधी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. त्याबद्दलही अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. “सोमवारपासून या परवानग्या दिल्या जाणार असल्या, तरी पॉझिटिव्हीटी रेट बघितला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर हे चालू केलं जाईल, अन्यथा निर्णय बदलावा लागेल. त्यामुळे माझं पुणेकरांना आवाहन आहे की, त्यांनी नियमांचं पालन करावं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

आषाढी वारीला मर्यादित स्वरूपात परवानगी

यंदा आषाढी वारीला जाण्याची परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली. वारकऱ्यांबरोबरच भाजपाकडूनही ही मागणी करण्यात आली होती. अखेर मागणीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहा मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली असून, त्यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपान काका महाराज (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर-पारनेर, अहमदनगर), संत चांगाटेश्वर महाराज (सासवड) य़ा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे.