फौजदारी आणि आर्थिक स्वरुपाची फसवणूक असेल वा कौटुंबिक वाद असतील, तर लोक पोलीस ठाण्यात गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण कोंबड्या अंडी देत नाहीत म्हणून कुणी पोलीस ठाण्यात गेल्याचं कधी ऐकलं का? तुमचा विश्वास बसणार नाही, पण असं खरंच घडलं आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अशी तक्रार देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी मागील आठ दिवसापासून अंडी देणं बंद केलं असून, यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पोल्ट्री चालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार बघून आता पोलीसही चक्रावले आहेत. कशामुळे घडला प्रकार? लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी याविषयी बोलताना म्हणाले,"म्हातोबाची आळंदी परिसरातील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी ११ एप्रिल रोजी एका कंपनीचे कोंबड्या करिता असलेलं खाद्य घातलं होतं. ते खाद्य दररोज दिलं जात होतं. ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांचं अंडी देणंच बंद झालं. यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणं बंद झालं असल्याचं प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल," अशी माहिती देण्यात आली.