खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणांमधील एकूण पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहोचला असून असाच पाऊस सुरू राहिल्यास खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणे दुर्दैवी ; खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, उर्वरित तिन्ही धरणांमधून बुधवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात ७५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात प्रत्येकी ५३, तर खडकवासला धरणक्षेत्रात १३ मि.मी. पाऊस पडला. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने वरसगाव आणि पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. परिणामी खडकवासला धरणातून बुधवारी सकाळपासून १२ हजार ७३६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहराच्या डेक्कन भागातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात २५ मि.मी., वरसगाव धरणक्षेत्रात १३ मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात १२ मि.मी. तर खडकवासला धरण परिसरात पाच मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सायंकाळनंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत १३ हजार ९८१ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : विद्यापीठातील वीजपुरवठा खंडित ; परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना त्रास

दरम्यान, पिंपरी-चिंचवड व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात ५३ मि.मी. पावसाची नोंद झाली. हे धरण १०० टक्के भरले असून या धरणातून २४६३ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत
टेमघर ३.७१ (१००), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), भामा आसखेड ७.६१ (९९.२२), पवना ८.५१ (१००), डिंभे १२.४९ (१००), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६७ (९९.३८), निरा देवघर ११.७३ (१००), भाटघर २३.५० (१००), वीर ९.४१ (१००) आणि उजनी ५३.५७ (१००)