खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला धरण वगळता उर्वरित तीन धरणांमध्ये शुक्रवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये २१.४९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. टेमघर, वरसगाव आणि पानशेत या धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली, तर खडकवासला धरणक्षेत्रात १४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सध्या टेमघर धरण ६१ टक्के, वरसगाव धरण ७२ टक्के, पानशेत धरण ७८ टक्के भरले आहे, तर सध्या गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने खडकवासला धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग तूर्त थांबविण्यात आला आहे. मात्र, नवीन मुठा उजवा कालव्यातून १००५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. या धरणात ६.९३ टीएमसी म्हणजेच ८१.४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्याच्या इतर धरणांमध्येही पावसाने सध्या उघडीप दिली आहे. येडगाव, घोड, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, आंद्रा आणि वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत

टेमघर २.२६ (६०.९८), वरसगाव ९.२८ (७२.३९), पानशेत ८.३६ (७८.४९), खडकवासला १.५९ (८०.६६), भामा आसखेड ७.१३ (९२.९९), पवना ६.९३ (८१.४८), गुंजवणी ३.१२ (८४.४८), निरा देवघर ७.७९ (६६.४४), भाटघर १७.३२ (७३.७२), वीर ९.२४ (९८.२१) आणि उजनी ४०.३८ (७५.३७)