पुणे- सातारा रस्त्यावर जांभुळवाडीजवळ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. हे कुटुंबीय मुंबई येथील रहिवासी असून ते आपल्या मुलीला सोडण्यासाठी पुण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक माहिती अशी, मुंबईत राहणारे यशवंत माने (वय ५५), शारदा यशवंत माने (वय ४६), ऋषीकेश यशवंत माने (वय १७) हे मुलीला सोडण्यासाठी आपल्या अल्टो कारने साताऱ्याकडे जात होते. पहाटेच्या सुमारास माने यांच्या भरधाव कारने एका ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, चालकासमवेत कारमध्ये असलेल्या माने कुटुंबीयांचा जागीच मृत्यू झाला. कारचाही चुराडा झाला. अपघातावेळी ऋषीकेश माने हा कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे ‘एबीपी माझा’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. चालक कृष्णा सुर्वे (वय ६५) यांचाही जागीच मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ससून रूग्णालयात नेण्यात आले आहेत.

माने यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी माने कुटुंबीय रविवारी पुण्याला आले होते. तिला सोडून ते फलटणला निघाले होते, असे सांगण्यात येते. माने कुटुंबीय मुंबईतील चुनाभट्टी येथे राहत.