सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘शिवशक्ती संगम’ शिबिरात प्रतिपादन
हिंदू हीच आपल्या समाजाची ओळख आहे, आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या पूर्वजांचा गौरव ही आपली संस्कृती आहे. या समाजातील मतभेद दूर करण्यासाठी मनातूनच विषमता दूर करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. वैयक्तिक प्रतिष्ठेपेक्षा देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची असते, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘शिवशक्ती संगम’ या पश्चिम महाराष्ट्रातील स्वयंसेवकांच्या शिबिरामध्ये रविवारी ते बोलत होते. सरसंघचालकांनी उपस्थित स्वयंसेवक आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया, प्रांत संघचालक नाना जाधव आणि प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात या वेळी उपस्थित होते. पुण्याजवळील मारुंजी येथे साडेचारशे एकरच्या विस्तीर्ण जागेवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगडावरील राजदरबाराच्या रूपातील भव्य व्यासपीठ, गणवेशात उपस्थित सुमारे एक लाखांहून अधिक शिस्तबद्ध स्वयंसेवक, सर्वोत्तम नियोजन या वैशिष्टय़ांनी सजलेल्या या शिबिराला पन्नास हजारांहून अधिक नागरिकांसह राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती.
भागवत म्हणाले, सरकार व नेते यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. केवळ तेच समाजाचे भले करू शकणार नाही. त्यांनी चांगले केलेले टिकायचे असेल तर समाज जागृत झाला पाहिजे. निर्बल समाजाला जगामध्ये किंमत नसते. ज्याची शक्ती असते त्याचेच ऐकले जाते. जसजशी देशाची शक्ती वाढते, तसतसे आपल्या देशाच्या सत्याची प्रतिष्ठाही वाढते. शक्ती म्हटल्यानंतर त्याच्या अर्थासंबंधीही आपल्याकडे निश्चित मान्यता आहे. शिवत्वाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिवत्वाला प्रतिष्ठा नाही. त्यामुळे शिवशक्ती संगमाची समाजाला आज गरज आहे. हा कार्यक्रम वैभवाचे प्रदर्शन करणारा नाही. तर, देशाच्या उत्थानासाठी प्रामाणिकपणे नि:स्वार्थ बुद्धीने देश उभारणीसाठी योग्यता मिळविण्याचा संघ हा एकमेव मार्ग आहे. धर्म, प्रांत, जात यांचा विचार न करता संकटामध्ये धावून जाणारा स्वयंसेवक हे संघाच्या प्रयोगाचे फलित आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना मानणारा समाज उभा करण्यासाठी एकाच वेळी शिवत्व आणि शक्तीची आराधना करावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यासह भाजपचे शहरातील सर्व आमदार या वेळी उपस्थित होते.

कायद्याने समता येणार नाही
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आर्थिक आणि सामाजिक एकता येत नाही तोवर राजकीय एकता प्रस्थापित होणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सांगितले आहे. सामाजिक भेदभावाला बळी पडलेल्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी घटनेमध्ये तरतूद केली. मात्र, केवळ कायद्याने समता येणार नाही. तर, मनातून विषमता गेली तरच कायदे यशस्वी होतील. समाजामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून गुणसंपन्न संघटित समाज निर्माण झाल्याशिवाय मूलभूत प्रश्नांवर उत्तर मिळणार नाही.

लक्ष गणवेशधारी स्वयंसेवकांनी घडविले संघशक्तीचे दर्शन 

क्षणचित्रे
* दीड लाखांहून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी.
* १५ वर्षांपासून ते शंभरी पार केलेल्या चार पिढय़ांच्या लाखाहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग.
* तळेगाव दाभाडे येथील १०२ वर्षांचे श्रीधर बल्लाळ आणि ९५ वर्षांचे चंदूलाल मेहता गणवेशामध्ये.
* धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
* गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दिलीप कांबळे हे मंत्री गणवेशामध्ये.
* महामार्गापासून ते मुख्य मंडपापर्यंत वाहतूक नियंत्रणाचे काम स्वयंसेवकांनीच केल्याने पोलीस आणि प्रशासनावरचा ताण झाला हलका.
* संघकार्याची माहिती सीडी, तिळगूळ वडी, पाण्याची बाटली व सरबताचे पॅकेट देऊन स्वागत.